TOD Marathi

नवी दिल्ली:

कॉंग्रेसचे नेते कबिल सिब्बल यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षाच्या सायकलवर जाणे पसंत केले तर आता काँग्रेसला (Congress) आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. राहुल गांधींचे पीए आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी हे पक्षासंबंधी निर्णय घेत आहेत, तसेच राहुल गांधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत असल्याचा आरोप करत गुलाम नबी आझादांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना एक पत्र लिहून हे आरोप केले आहेत.  

गुलाम नबी आझाद यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचं माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यापूर्वी ‘काँग्रेस जोडो यात्रा’ काढावी.

गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पत्रातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व आल्यापासून पक्षाचा पराभव होत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. पक्षाचे निर्णय हे ज्येष्ठ नेते किंवा वर्किंग कमिटी घेत नसून राहुल गांधी यांचे पीए आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

काँग्रेसमधील चर्चेची प्रक्रिया आता बंद झाली आहे. कोणताही निर्णय राहुल गांधींच्या मर्जीतल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्या नेत्यांकडून घेतले जातात, असाही आरोप गुलाम नबी आझादांनी केला आहे. पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारलं जात असून त्यांचा अपमान केला जात असल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळातील अध्यादेश फाडणे हे राहुल गांधींच्या अपरिपक्वतेचं लक्षण असून त्यांनी वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला. यूपीए सरकारचा रिमोट कंट्रोल मॉडेल आता काँग्रेसमध्येही लागू झालं असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.